गडचिरोलीच्या मुक्त पत्रकार स्वाधीनता बाळेकरमकर यांना नागपुरात ‘रानवेध’ पुरस्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील प्रश्न, तेथील लोकसंस्कृती आणि जल-जंगल-जमिनीच्या मुद्द्यांना आपल्या लेखणीतून मुख्य प्रवाहात आणणाऱ्या मुक्त पत्रकार स्वाधीनता बाळेकरमकर यांना यंदाचा प्रतिष्ठित ‘रानवेध सामाजिक पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नागपूर येथे आयोजित विशेष सोहळ्यात ‘आदिम लोकशक्ती फाउंडेशन’ चे अध्यक्ष नजुल पावीत व मुख्य संयोजक हिरामा ठाकूर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला.
स्वाधीनता बाळेकरमकर या कोणत्याही माध्यम समूहाशी बांधील न राहता मुक्त पत्रकार म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील सामाजिक समस्या, जल-जंगल-जमिनीचे प्रश्न तसेच लुप्त होत चाललेल्या आदिम संस्कृतीवर त्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या या निस्पृह, संवेदनशील आणि निर्भीड पत्रकारितेची दखल घेत आदिम लोकशक्ती फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना हिरामा ठाकूर म्हणाले, “आजच्या व्यावसायिक पत्रकारितेच्या युगात जमिनीवर उतरून काम करणाऱ्या स्वाधीनता बाळेकरमकर यांसारख्या मुक्त पत्रकारांची समाजाला नितांत गरज आहे. त्यांनी गडचिरोलीच्या मातीचा आवाज प्रामाणिकपणे जपला आहे.”
अध्यक्षीय भाषणात नजुल पावीत यांनी स्वाधीनता यांच्या कार्याचे कौतुक करत, हा सन्मान केवळ एका पत्रकाराचा नसून गडचिरोलीच्या संघर्षशील समाजाचा गौरव आहे, असे मत व्यक्त केले.
या सोहळ्याला नागपूरमधील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, साहित्यिक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Nagpur #Journalism #Award #SocialJournalism #RanwadhAward #IndependentJournalist #AdivasiIssues #TribalCulture #AdimLokshaktiFoundation #MaharashtraNews














