२१ वर्षांनंतर रंगला मैत्रीचा महाकुंभ ; किसान विद्यालय २००५ बॅचच्या गेट-टुगेदरची सर्वत्र चर्चा
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. ११ : किसान विद्यालय, कोरेगाव येथील २००५ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या भव्य गेट-टुगेदर कार्यक्रमाने परिसरासह सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगवली आहे. तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे अनमोल क्षण पुन्हा अनुभवले.
या पुनर्भेटीचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हजारो नागरिकांनी हे व्हिडिओ पाहिले असून अनेकांनी आपल्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देणारा हा उपक्रम असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कार्यक्रमात शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा देणारे विविध मनोरंजक उपक्रम, संवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुणजी राजगिरे, मुख्याध्यापक जगदीश केळझरकर, माजी मुख्याध्यापक मुंगमोडे तसेच सतीश दहिवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या संस्मरणीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव नागपूरकर, कमलेश बारस्कर, रुपेश केळझरकर, संजय दाने, गीता निकोडे, निराशा राजगिरे आणि शितल दहिवले यांच्यासह नियोजन समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या पुनर्भेटीमुळे जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याची भावना सहभागी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. मैत्री, आठवणी आणि भावनिक पुनर्मिलनाचा अनोखा संगम ठरलेला हा गेट-टुगेदर सोहळा परिसरात चर्चेचा विषय बनला असून ‘मैत्रीचा महाकुंभ’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














