कोहळी समाज : मुहूर्ताच्या पवित्रतेपासून मूल्यांच्या नव्या दिशेकडे प्रवास
कोहळी समाज म्हटला की सर्वप्रथम आठवते ती त्यांच्या परंपरेची शिस्त आणि मुहूर्ताबाबतची अढळ श्रद्धा. लग्नासारखा मंगल सोहळा ठरला की भडजीकडून काढलेला मुहूर्त तंतोतंत पाळला जावा, यासाठी संपूर्ण कुटुंब आणि समाज जागरूक असतो. मिनिटांच्या अचूकतेने विधी पार पाडणे ही त्यांची केवळ धार्मिक आस्था नसून ती त्यांच्या शिस्तप्रियतेची आणि संस्कारांची ओळख आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असलेला हा समाज शेतीशी घट्ट जोडलेला आहे. मातीत राबणारा, कष्टाला मान देणारा आणि निसर्गाशी सुसंवाद साधणारा हा समाज परंपरांच्या आधारावर उभा आहे.
मुहूर्ताचे पालन ही त्यांच्या जीवनपद्धतीची केंद्रबिंदू परंपरा आहे. इतर समाजांमध्ये मुहूर्त कधी औपचारिकता असू शकते; परंतु कोहळी समाजात तो जीवनातील पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. लग्नविधी योग्य क्षणी पार पडावा, यासाठी सर्व तयारी वेळेआधी पूर्ण केली जाते. ही वेळेची जाणीव त्यांच्या शेतीप्रधान जीवनातूनच आलेली आहे. पेरणी, कापणी, पावसाचा अंदाज, ऋतूंचे चक्र — या सगळ्यांमध्ये वेळेचे महत्त्व त्यांनी अनुभवले आहे. त्यामुळेच मुहूर्त हा त्यांच्या संस्कृतीचा आत्मा ठरला आहे.
मात्र बदलत्या काळात एक वेगळीच प्रवृत्ती डोके वर काढताना दिसते आहे. लग्नासाठी जोडीदार निवडताना संपत्तीला, विशेषतः जमिनीच्या सातबाऱ्याला, प्राधान्य देण्याची प्रवृत्ती वाढली आहे. “मुलाकडे किती जमीन आहे?”, “वडिलोपार्जित मालमत्ता किती आहे?” हे प्रश्न प्रथम विचारले जातात आणि शिक्षण, चारित्र्य, स्वभाव, समजूतदारपणा यांचा विचार नंतर होतो. आर्थिक सुरक्षिततेची भावना स्वाभाविक असली तरी तीच एकमेव निकष बनल्यास विवाह हा दोन कुटुंबांचा स्नेहबंध न राहता केवळ व्यवहार ठरतो.
ही प्रवृत्ती समाजाच्या प्रतिमेलाही बाधा पोहोचवत आहे. कष्टाळू आणि परंपरावादी अशी ओळख असलेला कोहळी समाज आज काही ठिकाणी “सातबारा पाहणारा समाज” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इतर समाजांमध्ये असलेला आदर हळूहळू कमी होऊ लागल्याची खंत व्यक्त केली जाते. केवळ बाह्य प्रतिमा नाही, तर समाजाच्या आतही अस्वस्थता वाढताना दिसते. युवक-युवतींना आपल्या गुणांपेक्षा संपत्तीला अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना निर्माण होते. परिणामी, श्रीमंत आणि सामान्य कुटुंबांतील दरी अधिक वाढते आणि समाजातील एकजूट कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो.
जर मुहूर्ताच्या एका मिनिटाचीही तडजोड आपण करत नाही, तर जीवनसाथी निवडताना मूल्यांची तडजोड का करावी, हा प्रश्न आज स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. संपत्तीचे महत्त्व नाकारता येणार नाही; परंतु तीच सर्वस्व मानणे हे समाजाच्या मूळ तत्त्वांशी विसंगत आहे. शिक्षण, चारित्र्य, संस्कार, परस्पर समजूतदारपणा आणि कुटुंबातील वातावरण हेही तितकेच महत्त्वाचे घटक आहेत.
आता कोहळी समाजासमोर नवी दिशा निवडण्याची संधी आहे. परंपरा जपत प्रगतीकडे वाटचाल करणे हेच आजचे खरे आव्हान आहे. विवाह निवडीत मूल्यांना अग्रक्रम देण्याची सामाजिक जाणीव निर्माण झाली, तर समाजाची प्रतिमा अधिक भक्कम होईल. युवक-युवतींच्या मताला मान्यता देणे, समाजस्तरावर संवाद वाढवणे आणि “संपत्तीपेक्षा व्यक्तिमत्त्व” हा संदेश रुजवणे या गोष्टी परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतात.
संपत्तीला प्राधान्य देण्याची वाढती प्रवृत्ती ही केवळ बदनामीचे कारण नाही; ती आत्मपरीक्षणाची संधी आहे. मुहूर्ताच्या पवित्रतेप्रमाणेच जीवनातील प्रत्येक निर्णय पवित्र आणि मूल्याधारित व्हावा, हीच अपेक्षा. विदर्भातून जर ही सकारात्मक चळवळ उभी राहिली, तर ती इतर समाजांसाठीही प्रेरणादायी ठरेल. परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत कोहळी समाजाने नव्या युगाची नवी ओळख निर्माण करावी, हीच काळाची मागणी आहे.
– चेतन गीता गंगाधर गहाणे
कुरखेडा
मो. ९१६८४३६२८५














