विद्यार्थ्यांना दिलासा : ऑफलाईन परीक्षांसाठी प्रत्येक तासामागे अधिकचे १५ मिनिटे वेळ मिळणार

416

– कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय झाल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
The गडविश्व
मुंबई : कोरोनामुळे शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मंत्री उदय सामंत यांना या संदर्भात युवा सेनेने पाठवलेल्या मागणी पत्रात म्हटले होते की, ”मागील दोन वर्षांत करोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व विद्यापीठांनी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाई पद्धतीने घेण्याचे ठरवले आहे.”
तसेच, ”या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की, दोन वर्षे (एमसीक्यू) बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे पेपेर लिहिण्यासाठी आवश्यक असलेला लिखाणाचा सराव राहिलेला नाही. म्हणून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आपणास विनंती करतो की, व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे. त्यापेक्षा अर्धा, एक तास वेळ वाढवून देण्यात यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत पूर्ण पेपर लिहिता येईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.” या पत्रावर युवासेना सचिव वरूण सरदेसाई आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांची स्वाक्षरी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here