निराधारांना ५ हजार मासिक सहाय्यासाठी माकपचा ठिय्या आंदोलन

59

– विविध मागण्यांनी तहसील गाजवले
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि. ०९ : गरिब, निराधार, वयोवृद्ध, विधवा महिला, शेतकरी आणि असंघटित कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आरमोरी तहसील कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन ०८ मे रोजी करण्यात आले. काॅ. अमोल मारकवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना काॅ. अमोल मारकवार म्हणाले की, “भांडवलदारांचे हजारो कोटींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारकडे गरिबांसाठी मात्र निधी नसल्याचे कारण दिले जाते, हे आम्हाला मान्य नाही. निराधारांना न्याय मिळेपर्यंत लढा थांबवला जाणार नाही.”
आंदोलनात सरकारकडून संजय गांधी, श्रावणबाळ आणि इतर योजनांतर्गत दिली जाणारी मासिक मदत रक्कम वाढवून किमान ५ हजार रुपये करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या योजनेतील विधवा महिलांना नव्याने लागू झालेल्या ‘लाडकी बहिन’ योजनेचा लाभही मिळावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत वेतन त्वरीत देण्यात यावे, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर, शालेय स्वयंपाकी व रोजगार सेवक यांसाठी मासिक २६,००० रुपये वेतन व ५,००० रुपये पेन्शन निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या संदर्भातही आंदोलनात अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांचा प्रोत्साहन निधी द्यावा, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी झाली.
बेघर लोकांना घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळावे, तसेच ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना शहराच्या आबादी भागात भूखंड देण्यात यावा. जबरानजोत केलेल्या शेतकऱ्यांना जमीनपट्टे द्यावेत, हत्तीच्या हल्ल्यामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर ७५,००० रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्याही मांडण्यात आल्या.
या शिवाय ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक २०२४’ रद्द करण्यात यावे, आरमोरी नगर परिषद हद्दीत रोजगार हमी योजनेची कामे सुरु करावीत, आणि शहरात पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा व्हावा, अशीही मागणी आंदोलकांनी केली.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, “ही लढाई आम्ही संपूर्ण राज्यभर नेऊन विधिमंडळाच्या दारापर्यंत पोहोचवणार आहोत.”
यावेळी मारोती गुरुनूले, मनसेच्या विभा बोबाटे, ज्योती सहारे, माकपचे तालुका सचिव काॅ. राजू सातपूते, काॅ. विठ्ठल प्रधान, माणिक कुर्वे, यशवंत नारनवरे, अर्चना मारकवार, मायाताई सिंदी, भगवान राऊत, किसन राऊत, अंजना कुंभलकर, सोनाली आचकुलवार यांच्यासह शेकडो निराधार महिला व वयोवृध्द शेतकरी या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here