रस्त्यांवरील खड्डे खपवून घेतले जाणार नाहीत – जिल्हाधिकारी पंडा यांचा कंत्राटदारांना कडक इशारा
– ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’तर्गत प्रथमच सुनावणी; निष्काळजी कंत्राटदारावर कारवाईची मोठी झडती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दुरवस्था आणि नागरिकांच्या तीव्र संतापाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी थेट स्वतःहून (सुमोटो) कारवाईची जबाबदारी स्वीकारत संबंधित कंत्राटदारावर ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३’ अंतर्गत सुनावणी घेतली.
महामार्गांच्या देखभालीत झालेल्या गंभीर निष्काळजीपणाबाबत ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुनावणी पार पाडली. रस्त्यांची बिकट अवस्था, उखडलेले डांबर, खड्ड्यांमुळे होणारे अपघात व नागरिकांचे हाल पाहता प्रशासनाने सार्वजनिक कामातील निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशारा यावेळी दिला.
‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’च्या कलम १५० ते १५२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या कलमांनुसार सार्वजनिक सुव्यवस्था, सुरक्षितता आणि सोयींवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या निष्काळजी कृतींवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांना थेट कारवाईचे अधिकार आहेत.
सुनावणीदरम्यान जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “शासकीय निधीचा प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी आहे. गुणवत्ताहीन व निष्काळजी काम करणाऱ्यांना प्रशासन माफ करणार नाही. नियमितपणे सुनावण्या घेऊन दोषींवर कठोर कारवाई होईल.”
या कारवाईनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार वर्तुळात खळबळ उडाली असून, जिल्ह्यात रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्वाची नवी पायरी सुरु झाल्याचे मानले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #CollectorAction #RoadNegligence #ContractorNotice #IndianCitizenSecurityCode #PublicAccountability #RoadSafety














