The गडविश्व
गडचिरोली : विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण. प्रेमसंबंधातून विवाह म्हटले कि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच पुन्हा अंतरजातीय विवाह म्हटला तर कुटुंबाचा विरोध तसेचा अनेक आडकाठी निर्माण होत असतात. कधी कधी दोघांची इच्छा असूनही अशा समस्येने विवाह होत नाही. असाच एक प्रेमीयुगलांचा प्रकरण गडचिरोली तालुक्यातील डोंगरगाव येथील तंटामुक्त समितीमध्ये पोहचला. अनेक वर्षापासून प्रेम करणाऱ्या प्रेमियुगलांची विवाह करून संसार थाटण्याची इच्छा होती. मात्र कुटुंबातील विरोध यात आडकाठी निर्माण करत होती. अखेर तंटामुक्त समितीने पुढाकार घेत प्रेमीयुगलांचा विवाह लावून दिला.
तालुक्यातील डोंगरगाव येथील बाल्या परशुराम रोहनकर याचे गावातीलच तृप्ती संजय गोहणे या मुलीसोबत अनेक वर्षापासून प्रेमसंबंध सुरू होते. रीतीरिवाजाप्रमाणे आपण लग्न करून आपला संसार थाटावा, अशी त्यांची इच्छा होती. परंतु मुलीच्या कुटुंबीयाकडून आंतर जातीय विवाहाला विरोध होता. प्रेमीयुगलांनी शेवटी तंटामुक्त समितीकडे धाव घेऊन आपली आपबीती सांगितली. समितीने पुढाकार घेऊन दोघांचे वय नियमानुसार योग्य आहे काय.? याकरिता कागदपत्राची शहानिशा केली व दोघांचीही विचारपूस करून दोघांच्याही सहमतीने महात्मा गांधी तंटामुक्तच्या माध्यमातून काल रविवार २९ मे रोजी दुपारच्या सुमारास हनुमान मंदिरच्या आवारामध्ये आंतर जातीय विवाह लावून दिला.
यावेळी तंमुस अध्यक्ष देवेद्र बांबोळे, पोलीस पाटील पंडित मेश्राम, सरपंचा अश्विनी सोदूरवार, ग्रामपंचायत सदस्य नेपाळ माध्यमवार, ग्रामपंचायत सदस्य दिपक बोलीवार, सदस्य रुपेश चुधरी, देवलता कोसनकर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)