वाढीव वीजदर विरोधात आप चे आंदोलन

197

– वाढीव वीजदर रद्द करण्याची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १४ जुलै : दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कंपन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी च्या वतीने बुधवार १३ जुलै राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. घरगुती वीज ग्राहकाला या महिन्यापासून साधारणतः २० टक्के दरवाढीचा फटका बसणार आहे. लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिले, पेट्रोल, गॅस सिलिंडर दरवाढ यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य जनतेस हा मोठा शॉक आहे. म्हणून ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी अशी मागणी गडचिरोली आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनातून करण्यात आली.
‘महावितरणकडून लॉकडाऊन काळात १ एप्रिल २०२० पासून २० टक्के वीज दर वाढ करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता नवे सरकार आल्याबरोबर जवळजवळ २० टक्के पर्यंत या महिन्यापासून दर वाढ केली आहे. शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिटपर्यंतची घरगुती वापरासाठीची वीज ३० टक्के स्वस्त देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाविकासआघाडी सरकार असताना मागच्या दोन वर्षात भाजप व स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरवाढ कमी करणे व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केली आहेत. आता वचन देणारे शिवसेना नेते आणि वीज दर कमी करण्याची मागणी करणारे भाजप सत्तेवर आल्याने आता जनतेला दिलासा देण्याची संधी त्यांना आहे, दरवाढ मागे घ्याच शिवाय आता ही ३० टक्के सवलत देत खरे शिवसैनिक असल्याचे दाखवून द्या ‘ असे आवाहन आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.
दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच पंजाब मध्ये नव्याने आलेल्या आपच्या भगवंत मान सरकार ने सुद्धा १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे. आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे. आजच्या निवेदनातून ‘ राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० टक्के अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी. वीज कंपन्यांचे कॅग / CAG ऑडीट करण्यात यावे, राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी अश्या मागण्या आज आम आदमी पार्टीने केल्या आहेत. जनतेच्या मनातही वीज बिल बाबत महविकास आघाडीवर रोष होता आता  नव्या सरकारला या मुद्द्यावरून आम आदमी घेरणार असे दिसते आहे .
आंदोलनाचे नेतृत्व आप चे जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे यांनी केले यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जिवतोडे, डॉ सुरेश गेडाम, शहर संयोजक कैलास शर्मा, संतोष कोटकर, महिला संयोजक अल्का गजभे, शहर संयोजक समिता गेडाम, मीनाक्षी खरवडे, हितेंद्र गेडाम, नामदेव पोले, गणेश त्रिमुखे, सोनल ननावरे, प्रमोद वाटे, कृष्णा खेवले, सुजाता मांडवे, प्रशिका पेटकर, ज्योती सायलवर, शिल्पा पेटकर, एकनाथ गजभे,प्रसाद खरवडे, दिवाकर साखरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here