– OMR आधारित लेखी परीक्षा होणार
– राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी
The गडविश्व
मुंबई : राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस भरतीला आज राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सदर पोलीस भरतीसाठी OMR आधारित लेखी परीक्षा राबविण्यात येणार असून या भरती संबंधीची प्रक्रिया तात्काळ राबविण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
राज्यातील पोलीस भरती दोन टप्प्यामध्ये राबविण्यात येत असून पहिल्या टप्यात ५ हजार पोलीस भरती ही पूर्ण झाली आहे तर दुसऱ्या टप्यातील ७ हजार २३१ पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. तसेच पोलीस भरतीच्या काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यानुसार दुसऱ्या टप्यातील या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातत्याने भरती प्रक्रयेतील घोटाळे लक्षात घेता या भरतीसाठी OMR आधारित लेखी परीक्षा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कोरोनामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते याचा फटका अनेक भरती प्रक्रियेला झाला त्यासोबतच पोलीस भरती प्रक्रियेवरही परिणाम झाले. राज्यातील लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)
शारीरिक चाचणी होणार पहिल्यांदा
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण ५० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी १६०० मीटर धावणे (२० गुण), १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण तर महिला उमेदवार ८०० मीटर धावणे (२० गुण). १०० मीटर धावणे (१५ गुण), गोळाफेक (१५ गुण) असे एकूण ५० गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण १०० गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी ५ कि.मी. धावणे (५० गुण), १०० मीटर धावणे (२५ गुण), गोळाफेक (२५ गुण) असे एकूण १०० गुण असणार आहेत.
शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.