दोन जहाल नक्षल्यांचे गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

1570

– शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला यश, ६ लाख रुपयांचे बक्षिस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli), २१ सप्टेंबर : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असून यश येतांना दिसत आहे. नुकतेच आज २१ सप्टेंबर रोजी दोन जहाल नक्षलींनी गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्यासमक्ष आत्मसमर्पण केले आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे उपस्थित होते. आत्मसमर्पित नक्षली मध्ये एका महिला नक्षली व एका पुरुष नक्षलीचा सहभाग आहे. अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर, (२६) रा. तिम्मा जवेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो (३०) रा. डांडीमरका पोस्टे आरेच्छा जि. नारायणपुर (छ.ग.) असे आत्मसमर्पित नक्षलीचे नावे आहेत. त्यांच्यावर ६ लाख रुपयांचे शासनामार्फत बक्षिस जाहीर होते.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

 

आत्मसमर्पीत पुरुष नक्षली “अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर”

– हा डिसेंबर २००९ साली कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन मे २०१० पर्यंत कार्यरत होता. मे २०१० ते २०१२ पर्यंत कसनसूर दलममध्ये कार्यरत होता तसेच २०१२ ते २०२२ या दरम्यान घरी राहूनच नक्षल दलमने सांगितलेले कामे करत होता. महाराष्ट्र शासनाने याच्यावर ४ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

सन २०११ मध्ये खोब्राामेंढा ॲम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे १ जवान शहीद व ०५ जवान जखमी झाले होते. २०११ मध्ये निहायकल ते ग्यारापत्ती रोडवरील ॲम्बुशमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफ १९१ बटालियनचे ०५ जवान जखमी झाले होते. २०११ मध्ये छोटा झेलीया जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता

शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षल्यांना पाठिंबा मिळत नाही. वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही. पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वत:च्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही त्यामुळे आपण आत्मसमर्पण केल्याचे सांगितले.

आत्मसमर्पित महिला नक्षली “रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो “

– ही २००९ ला जटपूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन १ महीना कार्यरत होती. २००९ ते २०१५ पर्यंत झोन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होती. २०१५ ते सन २०१८ पर्यंत एसीएम व उपकमांडर पदावर कार्यरत राहून माहे जुलै २०१८ ते सन २०२२ पर्यंत घरी राहून दलमचे काम करत होती. शासनाने हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

२०१५ मध्ये कुंदला (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती. २०१५ मध्ये गुंडूरपारा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमकीमध्ये सहभागी होती. २०१७ मध्ये दुरवडा (छ.ग.) येथे गोटूलमध्ये झालेल्या व जंगल परिसरात झालेल्या एकुण दोन चकमकीमध्ये सहभागी होती. २०१५ मध्ये भामरागड तालुक्यातील इरपनार गावातील ३ इसमाचा तीने खुन केलेला आहे.

नक्षलींना कोणत्याही कामासाठी पैसे दिले जात नाही. नक्षल दलममध्ये वरिष्ठ माओवाद्यांकडून स्त्री आणि पुरूष यांच्यामध्ये भेदभाव केला जातो. महीला नक्षल्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही. महीला नक्षल्यांना फक्त अवजड कामे दिली जातात व त्यांना महत्वाच्या अभियानात सहभागी केले जात नाही. वरिष्ठ माओवाद्याकडून महीला नक्षलींना लग्नासाठी बळजबरी केली जाते. पोलीस – नक्षल चकमकीदरम्यान महीला नक्षलींना समोर करून पुरूष नक्षली हे पळून जातात.

आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अनिल ऊर्फ रामसाय जगदेव कुजूर व रोशनी ऊर्फ ईरपे नरंगो पल्लो या दोघांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत ५१ जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­ऱ्या नक्षल्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी केले आहे.

Naxal Surrender , Gadchiroli Police ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here