– शेतकरी भयभीत
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात वाघाचे मानवांवरील हल्ले सुरूच आहेत. रविवारी पोर्ला नजीकच्या जंगल परिसरात वाघाने हल्ला करून इसमाला ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आज बुधवार २९ जून रोजी पुन्हा वाघाने इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील बोरी चक येथे सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. सागर आबाजी वाघरे असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, वाघरे हे आज सकाळच्या सुमारास जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात शेतकाम करण्याकरिता गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला यात ते ठार झाले. सदर घटनेची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून शेतीचा हंगाम सुरू झाल्याने वाघाच्या दहशतीने शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झाला आहे. ऐन शेती हंगामाच्या काळात अशा घटना घडत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. यामुळे मानव- वन्यजीव संघर्ष सुद्धा वाढण्याची शक्यता बळावली आहे. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.