The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १७ : गडचिरोली जिल्हा म्हणजे निसर्ग सौंदर्याचं अद्वितीय दालन — डोंगर, नद्या, जंगल आणि पाण्याचा खळखळाट यामुळे हा जिल्हा पर्यटकांना सतत आकर्षित करत असतो. अशाच रमणीय परिसरात वसलेलं एक दुर्लक्षित, पण अतिशय नयनरम्य स्थळ म्हणजे वराती डोह. धानोरा तालुक्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर कठानी नदीच्या काठावर हे ठिकाण वसले आहे.
स्थानीय लोककथेनुसार, पूर्वी याच नदीमध्ये एका वरात बुडाली होती. त्यानंतर या जागेला ‘वराती डोह’ असे नाव प्राप्त झाले. तीनही ऋतूंमध्ये वराती डोहचे सौंदर्य पर्यटकांना मोहात पाडते. विशेषतः हिवाळ्यात नदीचे सौंदर्य अधिकच खुलते – हिरव्या साजाने सजलेला परिसर, खळखळणारे पाणी आणि शांत वातावरण मनाला शांतता देते.
नदीपात्रात पसरलेले मोठमोठे दगड आणि मधोमध वाहणारे स्वच्छ पाणी यामुळे ते दृश्य जणू काही एखाद्या चित्रपटातलं भासते. स्थानिकांसह नागपूर, चंद्रपूर, मुंबईसारख्या शहरांतून आलेले पर्यटक येथे आवर्जून भेट देतात. अनेकजण येथे फोटो काढून आठवणींमध्ये साठवून ठेवतात.
मात्र, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे ठिकाण अद्यापही प्रशासनाच्या दृष्टीआड राहिले आहे. वराती डोहकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही, ना कोणतीही मूलभूत सोयीसुविधा. शासनाच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे ठिकाण अजूनही व्यापक पर्यटन नकाशावर येऊ शकलेले नाही.
कठानी नदीच्या काठावर काही नागरिकांची शेती असून ‘कोतलू आतला टोला’ नावाचे छोटेखानी वस्तीस्थानही आहे. येथे क्वचित शाळा सहलीसाठी येतात, काही लोक खासगी पार्टीचे आयोजन करतात. परंतु यामुळे प्लास्टिक कचऱ्यामुळे निसर्ग सौंदर्याला हानी पोहोचत आहे.
या पार्श्वभूमीवर धानोरा येथील जेएसपीएम महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. प्राचार्य डॉ. उदय थुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. टिकाराम धाकडे, प्रा. कैलास खोब्रागडे, प्रा. वटक मॅडम, प्रा. भाविकदास करमनकर, प्रा. विराग रणदिवे, प्रा. वसंत आवारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत साफसफाई अभियान राबवले. नदीपात्रातील प्लास्टिक कचरा संकलित करून जाळण्यात आला. भविष्यातही असे उपक्रम राबवून या परिसराचे सौंदर्य टिकवण्याचा निर्धार महाविद्यालयाने व्यक्त केला आहे.
शासन आणि प्रशासनाने या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी पावले उचलल्यास, वराती डोह केवळ धानोऱ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावर झळकू शकतो.
