– वीजप्रश्नावर आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील रांगी परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत. उकाड्याच्या दिवसात ही समस्या अधिकच तीव्र झाली असून, जरा जरी वादळी वारा अथवा अवकाळी पाऊस झाला तरी वीजपुरवठा तासन्तास बंद राहत असल्याने शेतकरी, व्यापारी, कार्यालयीन कामकाज व सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
विशेष म्हणजे, परिसरातील तब्बल १० गावांचा भार एका लाईनमनवर असल्याने तांत्रिक बिघाड दुरुस्तीत विलंब होतो. रांगीसारख्या गावात वीज गेली की ती दुसऱ्या दिवशीच येते, ही ‘नेहमीची बाब’ झाल्याचे स्थानिक सांगतात.

‘डबल लाईन’ची मागणी ठप्पच
रांगी परिसरातील नागरिकांनी डबल लाईन जोडण्यासाठी तसेच रांगी येथे स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यासाठी वारंवार लेखी निवेदने दिली आहेत. मात्र अद्याप कोणतीच ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ऑनलाईन कामकाज ठप्प – बँका, शासकीय कार्यालये प्रभावित
वारंवार होणाऱ्या वीज खंडनामुळे ऑनलाईन कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. बँका, शासकीय कार्यालये, इंटरनेट सेवा या सगळ्यावर वीजपुरवठा बंदीचा फटका बसतो. सातबारा, जात प्रमाणपत्र आदी शासकीय दस्तऐवज मिळवताना शेतकऱ्यांना व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
वीज विभागाच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ‘दुहेरी लाईन’, अधिक कर्मचारी व स्थानिक पातळीवर तातडीचा उपाययोजना न झाल्यास लोकांचा संयम सुटेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
रांगीसह परिसरातील वीजपुरवठा सुरळीत व नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.