मुरुमगाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा

1360

– शासनाला कोट्यवधीचा चुना
The गडविश्व
दिवाकर भोयर / धानोरा : तालुक्यातील मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून जवळपास २ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे बोलल्या जात आहे. या घोटाळ्यात अनेक मासे गडाला लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाची चोकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
सन २०२१-२२ मधील खरिप हंगामातील जवळपास ८०१८.१५ हजार तर रब्बी हंगामातील १८६०.८ क्विंटल धान्य कागदोपत्री असले तरी प्रत्यक्षात गोदामात धान्य उपलब्ध नसल्यामुळे घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. गोडावून मधील धान्य चोरीला गेले का ? कोट्यवधींचा घोटाळा झालाच कसा ? धान्य गेले कुठे ?. खरेदी केंद्रावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते का ? वेळोवेळी मालाची शहानिशा केली नाही का ? व्यवस्थापक आणि केंद्रप्रमुख दोन्ही पदे एकाच घरी कसे ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रकरणात काही अधिकारी सहभागी असल्याची शंका नागरिक व्यक्त करीत आहेत.
धानोरा पासुन २२ किलोमिटर अंतरावर असलेल्या मुरुमगाव धान खरेदी केंद्रामध्ये परिसरातील सुरसुंडी सबसेन्टर सह १७ गावे समाविष्ट आहेत. खरेदी केंद्रांत सभासद शेतकऱ्यांचे खरीप हंगामात २७६५८ क्विंटल धान्याची खरेदी झाली तर रब्बी हंगामात ६०१० क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले. त्यापैकी खरिपातील १९६४० हजार धान्याची डिओ होवून उचल झालेली आहे. ८०१८.१५ क्विंटल खरीपाचे शिल्लक दिसतात. रब्बीचे ४१५० क्विंटलची उचल होवून १८६०.८ शिल्लक असल्याचे फक्त कागदावर आहेत. प्रत्यक्षात गोडावूनला धान्यच नाही. धान खरेदी न करता कागदोपत्री जास्त दाखविण्यात येवून बिल मात्र काढण्यात आले असावे. त्यामुळे संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे उघड होत आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मर्या.र.न.७१६ मुरुमगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली या नावाने कार्यरत असून संस्थेचे एकूण ७८७ सभासद आहेत. सन २०२१-२०२२ मधे ७८७ सभासदाचे ७/१२ ऑनलाईन करण्यात आले. त्यापैकी ७३४ शेतकऱ्यांचे लॉट पाडण्यात आले. सर्व सभासद शेतकऱ्यांचे धान खरेदी करून त्याचे बिल तयार करून सदर बिलाची उचल करण्यात आले. मात्र, काही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे बोलल्या जात आहे. प्रत्यक्षात घेतलेले धान गेले कुठे आणि खरिप व रब्बी मिळून ९८७८.९५ क्विंटल धानाचा तुटवडा निर्माण झाला कसा, हे मात्र कळायला मार्ग नाहीत.
२४६५० कठ्ठ्याची तफावत असुन एवढी अफरातफर कोणी केली आणि तेही एकट्याने करणे शक्य नसून यात इतरांचाही सहभाग असावा एवढे मात्र खरे आहे. तर त्याची किमंत १ कोटी ९१ लाखाच्या घरात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस काम असुनही संबंधित विभाग मात्र कुंभकर्णी झोपेतच आहे.

– मुरुमगाव येथील आविका संस्थेतिल धान घोटाळ्यासंदर्भात उपप्रादेशिक व्यवस्थापक डी.एस.चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, दोषी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास प्रस्तावित केले असल्याचे त्यांनी सांगितले .

– एल.जी.धारणे व्यवस्थापक आविका मुरुमगाव यांना विचारले असता ९८७८.९५ क्विंटल धान्याची तफावत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here