गडचिरोली : वाघाने पुन्हा घेतला मानवाच्या नरडीचा घोट

1692

– घटनेने नागरीक भयभीत
The गडविश्व
गडचिराेली, २९ ऑगस्ट : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाघाचे मानवावरील हल्ले वाढत असून आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील इसम जंगल परिसरात सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला करून नरडीचा घोट घेऊन ठार केल्याची घटना आज २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बळीराम शिवराम कोलते (४७) रा. सालमारा ता. आरमोरी जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील बळीराम कोलते हे सरपणासाठी लाकडे आणण्यासाठी जोगीसाखरा जवळील शंकरनगर नाल्यालगत कक्ष क्रमांक ४७ राखीव जंगलात आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत सकाळच्या सुमारास गेले होते. दरम्यान लाकडे जमा करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने बळीरामवर हल्ला करून नरडीचा घोट घेत ठार केले. घटनेची माहिती सहकाऱ्यांनी गावात दिली असता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत गर्दी केली होती. त्यानंतर वनविभागाला घटनेची माहिती दिली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वारंवार वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करूनही बंदाेबस्त हाेत नसल्याने नागरिकांनी राेष व्यक्त केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सततच्या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्ष चिघळन्याची शक्यता आहे. नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातही नागतिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here