आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेल्या मातंग समाजासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १ वसतिगृह मंजूर करा : आमदार डॉ.देवराव होळी

164

– लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती सोहळ्यानिमित्त गोकुळनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन

The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : कैकाडी, भंगी, मादगी, मेहतर , मांग , गारुडी, मारीगा मातंग या आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत मागास असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वस्तीगृह मंजूर करून या समाजाला न्याय द्यावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आयोजित गोकुळनगर गडचिरोली येथील कार्यक्रमात केली
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वामनराव इंगळे, रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत, न. प. चे माजी सभापती विजय गोरडवार, ग्राम विस्तार अधिकारी दिगंबर लाटलवार, सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे , माजी नगरसेविका लताताई लाटकर, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, ज्ञानेश्वरजी बावणे, ज्ञानेश्वरजी पायघन, दीपक जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यामध्ये या समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासलेला असल्याने या घटकासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार डॉ.देवरावहोळी यांनी म्हटले. या समाजाला पुढे नेण्यासाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्याची आवश्यकता असून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष बाब म्हणून किमान एका वस्तीगृहाची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा केंद्रावर किमान एक वस्तीगृह मंजूर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here