सुरजागड प्रकल्प ठरला नागरिकांसाठी जीवघेणा : माजी जि .प.अध्यक्ष अजय कंकडालवार

315

– अहेरी पोलिसांनी सुरजागडच्या खनिज वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कलम २८३ अंतर्गत केली कारवाई
The गडविश्व
अहेरी, ८ ऑक्टोबर : आष्टी -आलापल्ली राष्ट्रीय मार्गावरील खमणचेरु – सुभाषग्राम जवळ सुरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या जवळपास ४० वाहनांवर माजी जि .प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने अहेरी पोलिसांनी कलम २८३ अंतर्गत कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास सुरजागड येथून खनिजाची वाहतूक करीत असलेले ४० वाहने आष्टी- आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावरील खमणचेरु – सुभाषग्राम जवळील रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यामुळे आलापल्ली-आष्टी मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अडचण निर्माण झाली होती. आधीच रस्त्याची चाळण झालेली असतांना रस्त्याच्या कडेला ट्रक उभे असल्याने अपुऱ्या रस्त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. याबाबत माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना काही नागरिकांनी माहिती दिली असता अजय कंकडालवार यांनी लगेच घटनास्थळ गाठून संबंधित प्रकार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दूरध्वनीद्वारे कळविले व कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने अहेरीचे ठाणेदार किशोर मानभाव यांनी घटनास्थळ गाठून ४० वाहनांवर सार्वजनिक रस्त्यामधील धोका किंवा अटकाव करीत असल्याबाबत कलम २८३ अंतर्गत कारवाई कारवाई करत संपूर्ण वाहनचालकांची कागदपत्र तपासणी केली व याबाबत पुढील कारवाई सुरु आहे.
सुरजागड येथून वाहतुकीसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडे परवाना नाही तसेच वाहनांचे कागदपत्रे अपुरे असतात व गुंड प्रवृत्तीचे लोक सदर प्रकल्पात गुंतले असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, ट्रक वाहनचालक रस्त्यावर येणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांच्या वाहनांना साईड देत नाहीत, नागरिकांच्या अंगावर वाहने नेतात यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांचा जीव गेला असून अश्या गंभीर समस्येकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. संपूर्ण रस्त्यांची निर्मिती होतपर्यंत उत्खनन व वाहतूक बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही माजी जि .प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे. त्यामुळे आता सुरजगड प्रकल्प काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here