पाणीटंचाईबाबत मौशीचक वासीसांची जिल्हा परिषदेवर धडक

152

– शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात मांडली गावातील पाण्याची समस्या
The गडविश्व
गडचिरोली : तप्त उन्हाळयाची सुरूवात होण्यापुर्वी गडचिरोली तालुक्यातील मौशीचक या गावात पाणीटंचाईची भिषण समस्या निर्माण झाली असून गावातील महिला, नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने गावातील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, या मागणीसाठी गावकऱ्यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक देऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासमोर मौशीचक येथील पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी जोर लावून धरली. तसेच याबाबत जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मौशीचक येथील पाणीटंचाईच्या समस्येकडे लक्ष वेधले.
गडचिरोली तालुक्यातील मौशीचक हे ४५० लोकसंख्येचे गाव असून गावात पाणीपुरवठा योजना नाही. गावात केवळ एक बोरवेल व एक विहीरी आहे. यावरच गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागते. गावातील हातपंप व विहीरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेली असून आता उन्हाळयाच्या प्रारंभीच गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागते आहे. गावातील पाणीटंचाईमुळे नागरिकांबरोबरच पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने जलजीवन इतर पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतू या क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने मौशीचक गावात पाणीपुरवठा योजना अथवा नवीन विहीर, हातपंप होऊन शकले नाही. गावातील एकमेव हातपंप व विहीरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेल्याने गावात पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे.
मौशीचक वासीयांनी गावातील पाण्याची समस्या शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या समोर मांडली. त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषद गाठत ग्रामीण पाणीपुरवठा विभागााचे कार्यकारी अभियंता यांना समस्या अवगत करून दिली. कार्यकारी अभियंता यांनी मौशीचक येथील पाण्याच्या समस्येवर ताडीने उपायोजना करण्यात येईल, असे आश्वासन मौशीचक वासीयांना दिले.
मौशीचक येथील पाण्याची समस्या गंभिर आहे. गावात एक विहीर व एक हातपंप आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे माता भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. गावापासून दोन किमी अंतरावर बारमाही पाणी वाहणारा नाला आहे. या नाल्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यास मौशीचक व परिसरातील इतर गावांना मुबलक पाणी मिळेल आणि पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटेल. त्यामुळे मौशीचक येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंद कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, स्वप्निल खांडरे, रविंद्र तुराटे, नानाजी हुलके, चरण देशमुख, अनंता हुलके, अनुराग चिचोलकर, जांनकिराम सालोटकर, मुरलीधर चिंचोलकर, किशोर देशमुख, काशीनाथ वघाड़े, धनेश्वर ठाकरे, समीर टेकाम, निकेश लोहबरे, अरुण बरपात्रे, राहुल सोरते, संजय शेंडे, निरंजन लोहबरे, संदीप भुरसे, गोपाल पानसे, स्वप्निल ढोढरे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here