आज दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल : बघा एका क्लिक वर

2568

The गडविश्व
गडचिरोली, २ सप्टेंबर : जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत इयत्ता १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल आज ०२ सप्टेंबर रोजी दुपारी ०१ :०० वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी ) पुरवणी परीक्षा २७ जुलै, २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) ची पुरवणी परीक्षा २१ जुलै २०२२ ते २४ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल आज ०२ सप्टेंबर रोजी दुपारी १ :०० वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे.
इयत्ता दहावी व बारावीचा पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर दुपारी ०१.०० वाजता पासून पाहता येणार असून विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार आहे.
ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी ( श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इ.१० वी साठी ( http://verification.mh-ssc.ac.in) व इ.१२ वी साठी (http://verification.mh-hsc.ac.in ) स्वतः किंवा शाळा/ कनिष्ट महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शनिवार,०३ सप्टेंबर २०२२ ते सोमवार १२ सप्टेंबर २०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार,०३ सप्टेंबर २०२२ ते गुरूवार २२ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.
जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
सन २०२३ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इयत्ता १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ट व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे व ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे Transfer of Credit घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
मार्च २०२२ मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुनःश्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मार्च २०२२ परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारसाठी मार्च २०२३ परीक्षा ही अंतिम संधी असेल याची नोंद घ्यावी. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही.

निकाल पाहण्यासाठीच क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here