The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ३१ ऑगस्ट : तालुक्यातील देलनवाडी येथे सुरू असलेल्या आश्रय जण चॅरिटेबल ट्रस्ट गडचिरोली अंतर्गत ज्ञानगंगा अभ्यासिकेमध्ये ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन सणानिमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये भावानेच बहिणीला राखी बांधत वर्षानुवर्ष सुरू असलेला परंपरेला छेद देत नवीन पायंडा रोवला आहे.
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा प्रसिद्ध सण आहे. रक्षा म्हणजेच संरक्षण आणि बंधन म्हणजे बंधन. राखी सामान्यतः बहिणी भावाला बांधतात. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावांच्या प्रगतीसाठी मनोकामना व्यक्त करते आणि भाऊ आपल्या बहिणीला संरक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ आपल्या बहिणींना काही भेटवस्तू देतो. भारतीय परंपरेनुसार अशा पद्धतीने हा सन साजरा केला जातो.
परंतु ज्ञानगंगा अभ्यासिकेचे मुख्य संयोजक वाल्मीक नन्नावरे यांच्या संकल्पनेतून एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये ज्ञानगंगा अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील विद्यार्थिनींना राखी बांधली. २१ व्या शतकातील बहिणींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी भाऊरायावर अवलंबून राहणे म्हणजे स्त्रीने स्वतःला असक्षम समजण्यासारखे आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण्याच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे तिला संरक्षणाचे वचन देऊन ती असक्षम असल्याची दरवर्षी जाणीव करून द्यायची.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुय्यम दर्जाचे स्थान देऊन तिला कायम ऐतिहासिक गुलामगिरीत राहायला भाग पाडले आहे. या सामाजिक धारणेत बदल व्हायला हवेत. मातृसत्ताक संस्कृतीत स्त्रीला उच्च दर्जाचे स्थान आहे. यानुसार स्त्री हीच कुटुंबसंस्थेचा व समाज व्यवस्थेचा प्रमुख कणा असतो. म्हणून पुरुष असलेल्या भावानेच स्त्री असलेल्या बहिणीकडून स्वतःच्या रक्षणाचे वचन घ्यावे. भावाने स्वतःच्या बहिणीच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक प्रगतीसाठी प्रकृतीकडे मनोकामना व्यक्त करावी. बहिणीने भावाला भेटवस्तू द्यावी. तिचं स्वातंत्र्य मान्य करावं. हा परिवर्तनशील विचार ठेवून बहिणीला रक्षाबंधन हा उत्सव ज्ञानगंगा अभ्यासिकेमध्ये साजरा करण्यात आला.यावेळी निलेश पदा आणि अमोल ढोक ,कबीर कुंभलवार,विजय नेवारे,नरेश कांबळे,गेमराज गेडाम,लोकेश नेवारे उपस्तीत होते.

“फक्त मुलगाच मुलीचे म्हणजेच बहिणीचे रक्षण करू शकतो, असा आजपर्यंतचा सामाजिक समाज आहे. कारण तो सक्षम आहे आरोग्याने सुदृढ आहे. पण कित्येकदा असे घडले आहे की भावावर आलेल्या संकटाचा सामना हा बहिणीने केला आहे .भाऊ रडत असतो, खचलेला असतो तेव्हा त्याच्या पाठीशी नेहमी बहीनच खंबीर पणे उभी राहून धीर देताना मी बघितले आहे. भावाने न व्यक्त केलेल्या भावना बहिणीला कळतात. परिस्तिथीचा कोणताही विचार न करता बहिण भिंती प्रमाणे नेहमी भावाच्या मागे संकटात उभी असते. बहीण आणि भाऊ एकमेकानची ताकत असतात. दोघेही एकमेकांची काळजी करतात. मग भावानीच बहिणीला राखी बांधणे यात काय गैर आहे?. भावनेच बहिणीला कमजोर समजून तिचे रक्षण का करावे? भावाने सुद्धा सक्षम समजून बहिणीला रक्षणाची जबाबदारी द्यावी. तिला स्वतंत्र द्यावे आणि मुक्तपणे जगू द्यावे.”
-वाल्मीक ननावरे
ज्ञानगंगा अभ्यासिका संयोजक