गडचिरोलीत बळजबरी प्रकल्पांविरोधात संघर्षाचा बिगुल : २६ जून ला सामूहिक बैठक

36

– जनतेने मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.१३ : विकासाच्या नावाखाली गडचिरोली जिल्ह्यात रेटले जात असलेल्या बळजबरी प्रकल्पांविरोधात आता जनतेच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात न घेता सुरू असलेल्या खाणी, विमानतळ, व औद्योगिक प्रकल्पांमुळे भविष्यातील मोठ्या विस्थापनाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसभा, डावे-प्रागतिक पक्ष, विविध संघटना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते एकत्र येऊन या लुटीच्या डावाविरोधात व्यापक संघर्ष छेडण्याचा निर्धार करत आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामदास जराते यांनी सांगितले की, “एट्टापल्ली सह कोरची तालुक्यातील लोह खाणीमुळे ग्रामसभांचे वनहक्क, जिंदाल स्टील, कोनसरी एमआयडीसी आणि भेंडाळा विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी कवडीमोल दराने बळकावल्या जात आहेत. यामुळे वनहक्काचे उल्लंघन होत असून ग्रामसभांच्या अधिकारांवर गदा येत आहे. लोकप्रतिनिधी मात्र संशयास्पद भूमिकेत आहेत.”
या पार्श्वभूमीवर गुरुवार, २६ जून रोजी गडचिरोली येथे जिल्हाभरातील ग्रामसभा, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पर्यावरणतज्ज्ञ व लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेण्यात येणार असून त्यात भविष्यातील संघर्षाची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, धनराज दामले, प्रा. अनिल होळी, अतुल मडावी, शेकापचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, तसेच माकपचे गडचिरोली तालुका सचिव डॉ. धर्मराज सोरदे उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेने या लुटीविरोधी लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here