सिंदेवाही : टस्कर हत्तीच्या हल्ल्यात वृद्ध इसम ठार, परिसरात भीतीचे वातावरण

728

– चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच हत्तीच्या हल्ल्यात मृत्यूची नोंद
The गडविश्व
सिंदेवाही, १५ : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आज सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत रानटी टस्कर हत्तीने ७० वर्षीय वृद्धास ठार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
जाटलापुर गावातील रहिवासी मारोती कवडु मसराम (वय ७०) हे आज (१५ जून) सकाळी सुमारास गावाबाहेर शौचासाठी गेले होते. याच दरम्यान जंगलातून भटकत आलेल्या टस्कर हत्तीने अचानक हल्ला चढवून त्यांना चिरडले. मारोती मसराम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तीच्या हल्ल्यातील पहिली मृत्यूची घटना असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही घटना अचानक घडली असली तरी मागील काही महिन्यांपासून परिसरात ओडिशातून आलेल्या रानटी हत्तींचा वावर सुरू आहे. ओडिशा राज्यातून आलेल्या एका मोठ्या कळपातून हे दोन टस्कर हत्ती वेगळे होऊन गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये संचार करत आहेत. यापूर्वी त्यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, आरमोरी तालुका यांसह अनेक भागांत धुमाकूळ घातला होता. सध्या हे हत्ती सिंदेवाही तालुक्यातील जाटलापुर, कोहली, चिरोडी, वायगाव, पळसगाव परिसरात सक्रिय आहेत अशी माहिती आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. हत्ती गावालगत फिरत असूनदेखील वनविभाग वेळेवर नागरिकांना सावधान करत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “सतत तीन वर्षे हत्ती परिसरात वावरत असताना वनविभाग नेमकी कोणती उपाययोजना करतोय? नागरिकांचे प्राण धोक्यात येत असताना विभाग फक्त पंचनामे करून थांबतो,” असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचं आवाहन केलं आहे. जंगल परिसरात अथवा हत्तीच्या वावराच्या दिशेने जाणं टाळावं, हत्ती दिसल्यास तात्काळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवावं, शाळकरी मुले, वृद्ध व्यक्ती, शेतकरी यांनी एकटे जंगलात जाणं टाळावं.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीची मदत देण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे कळते. शासनाकडे वन्यप्राणी हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या अर्थसाहाय्याच्या प्रस्तावासही मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हत्ती ट्रॅकिंग यंत्रणा, ड्रोन पाळत, आणि गावपातळीवर अलर्ट सिस्टीम सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

#SindevahiElephantAttack #ChandrapurWildlifeConflict #JatlapurIncident #TheGadvishva #ForestDept #BreakingNews #GadchiroliWildlife #HumanWildlifeConflict

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here