– गडचिरोली-पेंढरी एसटी सेवा अद्याप बंदच0; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २८ : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारात नुकत्याच दाखल झालेल्या 40 नव्या बसेसची हवा झाली असली, तरी प्रत्यक्षात दुर्गम भागातील प्रवाशांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. विशेषतः धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील गडचिरोली-पेंढरी-पाखांजूर मार्गावरील एसटी सेवा पूर्ववत सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
पेंढरी हे आदिवासीबहुल, अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखले जाते. येथे फारच मोजक्या एसटी बसेस धावत असल्यामुळे नागरिकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते. नुकत्याच गडचिरोली आगारात मानव विकास मिशन अंतर्गत 35 शालेय व 5 प्रवासी अशा 40 नव्या बसेस दाखल झाल्या. त्यामुळे पेंढरी परिसरात बससेवा पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात गाड्या जुन्याच वेळापत्रकानुसार धावत असून, पेंढरी मार्ग वगळण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पूर्वी गडचिरोलीहून पेंढरीमार्गे पाखांजूरकडे जाणाऱ्या दोन बसेस – सकाळी 6.30 आणि दुपारी 2 वाजता नियमितपणे धावत होत्या. परंतु सध्या त्या बंद असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे बससेवेचा लाभ मिळावा, यासाठी पेंढरी परिसरातील जनतेने पुन्हा एकदा मागणीचा आवाज बुलंद केला आहे.
“निवेदन देऊनही बससेवा पूर्ववत न होणे हा एसटी महामंडळाच्या व्यवस्थेचा बेजबाबदारपणा दर्शवतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. आता या मागणीला प्रतिसाद देत महामंडळ कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
