– ईरुपटोला गावात वज्राघाताची दुर्दैवी घटना, खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे चित्र समोर येत आहे. १० जून रोजी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ईरुपटोला गावात विजेच्या कडकडाटासह वादळाने दहशत निर्माण केली. त्यातच आकाशातून पडलेल्या विजेचा जबरदस्त तडाखा बसून एका शेतकऱ्याचे तीन बैल जागीच ठार झाले.
ही दुर्दैवी घटना गावकऱ्यांना हादरवून गेली असून, शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. काही दिवसांत खरिप हंगाम सुरू होणार असताना, शेतीची कामे करणे कठीण होणार आहे. शेतात राबणारे बैल हरपल्यामुळे शेतकरी कुटुंब अक्षरशः हतबल झाले आहे.
या घटनेमुळे निसर्गाच्या अनपेक्षित कोपामुळे ग्रामीण भागातील बळीराजा कसा संकटात सापडतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामा करून योग्य आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
स्थानिकांनी देखील प्रशासनाकडे लक्ष देण्याचे आवाहन करत, अशा प्रकारच्या घटनेमुळे होणाऱ्या शेती नुकसानाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
