गडचिरोली शहरातील बहुतांश आधार केंद्रे बंद

25

– एकमेव सुरु असलेल्या केंद्रावर नागरिकांची प्रचंड गर्दी
The गडविश्व
गडचिरोली, दि.१३ : गडचिरोली शहरातील नागरिकांना सध्या आधारकार्ड संदर्भातील कामांसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने “सुलभ सेवा, सर्वसामान्यांसाठी” या उद्दिष्टाने जिल्ह्याच्या प्रत्येक भागात आधार नोंदणी व दुरुस्ती केंद्रे कार्यान्वित केली होती. मात्र, प्रत्यक्षात गडचिरोली शहरातील बहुतेक आधार केंद्रे सध्या बंद असून, केवळ पंचायत समिती परिसरातील एकच केंद्र सुरु आहे. त्यामुळे शहरातील व आसपासच्या परिसरातील नागरिकांना आधारसंबंधी कामांसाठी एकाच केंद्रावर विसंबून राहावे लागत आहे.

एकच केंद्र, हजारो लोकांची गर्दी

पंचायत समितीमधील सुरु असलेल्या एकमेव आधार केंद्रावर दररोज शेकडो नागरिकांची गर्दी उसळते. यामध्ये नविन आधार कार्ड बनविणे, जुने आधार अपडेट करणे, मोबाईल नंबर लिंक करणे, बायोमेट्रिक अपडेट करणे आदी कामांसाठी नागरिकांची मोठी संख्या येते. अनेक वेळा नागरिक पहाटेपासून रांगेत उभे राहतात, मात्र संध्याकाळपर्यंत त्यांच्या कामाचा नंबरच लागत नाही.
यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध, दिव्यांग नागरिक यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रांगेत उभं राहूनही “सर्वर डाऊन”, “सिस्टम बंद”, “वेळ संपला” अशा कारणांनी कामे प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे तक्रार, संताप, आणि हतबलता यांची सरमिसळ दिसून येत आहे.

नगर परिषद केंद्र ठप्प, कारण ‘लिंक नाही

गडचिरोली नगर परिषदेच्या मुख्य इमारतीत असलेले आधार केंद्र गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत आहे. केंद्रात संगणक चालक नेहमी उपस्थित असतो, मात्र कामासाठी आलेल्या नागरिकांना “सर्वर लिंक नाही” असे सांगून परत पाठवले जाते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “केंद्र उघडं असतं, कर्मचारी बसलेलेही असतात. पण काम काही होत नाही. काही वेळा कर्मचारी मोबाईलवर गुंग असतात तर काही वेळा बाहेर गेलेले असतात. यामुळे वेळ वाया जातो आणि काम होईपर्यंत अनेक दिवसांचे फेरे लावावे लागतात.”

नागरिकांची तीव्र नाराजी व मागणी

गडचिरोली शहर आणि परिसरातील लोकसंख्या ही लक्षणीय असून, रोज किमान २००-३०० नागरिक आधारकार्डसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या कार्यरत असलेल्या एकमेव केंद्रावर एवढ्या नागरिकांची कामे वेळेत होणे अशक्य असून, त्यामुळे अनेकांना वैफल्य आणि त्रासाचा सामना करावा लागत आहे.
नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत शहरात अधिकृत आधार केंद्रांची संख्या वाढवावी, बंद असलेली केंद्रे तातडीने सुरु करावीत आणि सेवा सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. यासोबतच कार्यरत केंद्रांवरील मनुष्यबळ वाढवून वेळ वाढवण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष?

या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने याकडे अद्याप लक्ष दिले नसल्याचे दिसून येते. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जिल्हा प्रशासन, नगर परिषद आणि UIDAI (आधार प्राधिकरण) यांच्यातील समन्वय अभावी सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #aadhar #uidai #aadharcard #aadharcenter)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here