– निधी असूनही पत्रकारांचा अपमान ; संदीप काळे यांचा इशारा
The गडविश्व
मुंबई, दि. १५ : “निधी आहे, योजना आहेत, पण सरकारकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे,” अशा शब्दांत व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकारांच्या सन्मान आणि हक्कांसाठी सरकारला ठणकावले. माहिती महासंचालनालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “११ हजारांहून अधिक पात्र वरिष्ठ पत्रकार आपल्या सन्मानाची वाट पाहत आहेत. सरकारकडे १२० कोटी रुपयांचा निधी असूनही निर्णय होत नाहीत. अशा परिस्थितीत आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही.”
पत्रकारांच्या सन्मानासाठी स्वतंत्र आर्थिक लेखाशीर्ष तयार करून किमान ५०० कोटी रुपयांची निश्चित तरतूद करावी, तसेच आरोग्यविषयक योजना ट्रस्टच्या माध्यमातूनच राबवाव्यात, अशी ठोस मागणी त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. सध्या शासनाकडे ४०१७ वरिष्ठ पत्रकारांची अधिकृत नोंद असून, त्यांना सन्मान दिल्यास केवळ ६.२८ कोटींचा खर्च येतो. प्रतिवर्षी फक्त ४० लाख रुपये खर्चूनही ही योजना राबवता येऊ शकते, पण सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
काळे यांनी सन्मान योजनेची पात्रता ३० ऐवजी २० वर्षे पत्रकारिता करण्याची, वयोमर्यादा ६० ऐवजी ५८ वर्षे करण्याची, निष्कलंक सेवा बजावलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची, तसेच वरिष्ठ पत्रकारांची अद्ययावत नोंद ठेवण्याची मागणी केली. शासनमान्य माध्यमांना प्राधान्य देत त्यांचा कोटा दुप्पट करावा, आणि ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ तातडीने अंमलात आणावी, अशीही भूमिका त्यांनी घेतली.
“शासनाने ‘शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी’मध्ये १०० कोटी रुपये ठेवल्याचे जरी खरे असले, तरी आजवर ११,००० पात्र पत्रकारांपैकी कोणालाही २० हजारांचेदेखील मानधन मिळालेले नाही, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे,” असे सांगत त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीत सातत्य नसेल, तर पत्रकारांवरील अन्याय थांबणार नाही, असे स्पष्ट केले.
बैठकीत सरकारने काही सकारात्मक संकेत दिले असून, लवकरच निर्णय होईल, अशी आशा संदीप काळे यांनी व्यक्त केली. मात्र त्याचबरोबर, “जर पुन्हा वेळकाढूपणाच झाला, तर आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
