ग्रामपंचायत गेवर्धा ठरली ‘सुंदर गाव’ स्पर्धेची मानकरी

188

– ४० लाखांचे पारितोषिक पटकावले
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा 2022-23 मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत गेवर्धा हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे.
स्वच्छता, व्यवस्थापन, उत्तरदायित्व, पारदर्शकता व तंत्रज्ञान या मूल्यमापनाच्या महत्त्वपूर्ण निकषांवर गेवर्धा ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. मात्र गेवर्धा ग्रामपंचायतीने आपल्या सर्वांगीण विकासातून इतरांचा मागे टाकत हे गौरव मिळवले.
ही घवघवीत कामगिरी ग्रामस्थांच्या सहभागातून, स्थानिक नेतृत्वाच्या दूरदृष्टीतून व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे शक्य झाली. पुरस्कार मिळाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण असून, स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी परिश्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धा ही ग्रामविकास विभागामार्फत राबविली जाणारी महत्त्वपूर्ण स्पर्धा असून, ग्रामपातळीवरील सुशासन व नवोन्मेषी उपक्रमांना चालना देण्याचा तिचा उद्देश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठीही गेवर्धा हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here