The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्परता दाखवत यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्याचे निर्देश राज्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे तसेच मजबूत संदेश प्रणाली निर्माण करून प्रत्येक नागरिकापर्यंत पूर्वसूचना पोहोचवण्याचे आदेश दिले.

“प्रत्येक नागरिक मोबाईलने जोडला गेला पाहिजे”
जयस्वाल यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. “प्रत्येक व्यक्तीला मोबाईल आणि इंटरनेट सुविधा मिळाल्याच पाहिजेत. नागरिकांचे मोबाईल क्रमांक नोंदवा व वेळेवर सूचनांची माहिती द्या,” असे ते म्हणाले. यामुळे ना फक्त आपत्ती काळात प्रतिसाद वेळेत मिळतो, तर गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळते, असेही ते म्हणाले.
आपत्तीची व्यापक तयारी – पूर, आग, भूकंप यांचा समावेश
आपत्ती केवळ पुरापुरती मर्यादित नाही, तर आग, भूकंप, इतर नैसर्गिक संकटांचा समावेश करत आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळाचे नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. साठवलेले साहित्य योग्य स्थितीत आहे की नाही, याचीही चौकशी झाली.
रेड आणि ब्लू लाईन सर्व्हे तातडीने पूर्ण करा
पूर धोका असलेल्या झोनमधील घरांची माहिती मिळवण्यासाठी रेड व ब्लू लाईन सर्व्हे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. नदीकिनारी राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षित पुनर्वसन करत प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.
आरोग्य, वीज आणि संपर्क यंत्रणा सज्ज ठेवा
संपर्क तुटलेल्या गावात वैद्यकीय पथके नियुक्त करावीत
एअर ॲम्बुलन्स सेवा देण्यासाठी सेवापुरवठादारांशी करार
मच्छरदाणी, फवारणी व आरोग्य सुविधा पुरवाव्यात
लाईनच्या झाडांची छटाई करून वीजपुरवठा अखंडित ठेवावा
वीज रिस्टोरेशन २४ तासांत व्हावा, अशी सक्त सूचना
बोगस डॉक्टरांवर कारवाई – पूल बांधकामास वेग
बोगस डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी, असा आदेश देताना त्यांनी रस्ते व पूल बंद पडल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सज्ज राहावे, असे निर्देश दिले. पूल रस्त्याचाच भाग असल्याने वनविभागाची परवानगी गरजेची नाही, हे स्पष्ट करत रस्त्यांच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असेही त्यांनी सुचवले.
समन्वयाने काम करा – जिल्ह्याची सुरक्षा सामूहिक जबाबदारी
“आपत्तीपूर्व, आपत्ती काळात आणि नंतरची कार्यपद्धती ठरवा. प्रत्येक विभाग एकत्रितपणे काम करावा, ही जिल्ह्याच्या सुरक्षिततेची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत सहपालकमंत्र्यांनी सजग प्रशासनाची गरज अधोरेखित केली.
बैठकीस जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, सीईओ सुहास गाडे व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews ##DisasterPreparedness #GadchiroliAlert #AshishJaiswal #EmergencyResponse #FloodPreparedness #MobileConnectivityForAll #StrongAlertSystem #DisasterManagementMeeting #GadchiroliNews #SmartGovernance