गडचिरोली : नागरिकांनी भरमार बंदुकांसह स्फोटकसदृश्य वस्तू केल्या जमा

268

– आणखी पाच गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नागरिकांनी भरमार बंदुकांसह स्फोटकसदृश्य वस्तू पोलिसांकडे जमा केल्या तसेच तालुक्यातील आणखी पाच गावांनी माओवाद्यांना गावबंदी केली आहे.
माओवादाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असते. सन २००३ पासून शासनामार्फत नक्षल गावबंदी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध शासकिय योजनांच्या लाभामुळे २४ जून २०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील मोरडपार, आलदंडी, कोयर, गोपणार व मुरुंगल या पाच (05) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी उपपोस्टे लाहेरी यांना सादर केला.
यापूर्वी १४ जून २०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत पोस्टे धोडराज येथे घेण्यात आलेल्या कृषी मेळाव्यामध्ये हद्दीतील परायणार, नेलगुंडा, कुचेर, कवंडे, गोंगवाडा, मिळदापल्ली व महाकापाडी या सात (07) गावातील नागरिकांनी एकत्रितपणे येऊन सर्वानूमते नक्षल गावबंदी करुन त्याबाबतचा ठराव प्रभारी अधिकारी पोस्टे धोडराज यांना सादर केला होता. त्यानंतर भटपार गावकऱ्यांनीही माओवाद्यांना गावबंदी करुन कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू, वायर, बॅटर व सलाखी (Spikes) पोस्टे धोडराज येथे २० जून २०२४ रोजी जमा केल्या होत्या. त्यात आणखी एक भर म्हणून गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी व सचिव, जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम गिरीधर तुमरेटी याने सहपत्नी ललीता चैतु उसेंडी (डिव्हीसीएम भामरागड दलम) सह २२ जून २०२४ रोजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जाणा­या भामरागड व अबुझमाड जंगल परिसरातच त्यांच्या अस्तित्वाला खिंडार पडले आहे.
आज गावबंदी केलेली पाच ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर स्थित असून माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुझमाड परिसराच्या अगदी जवळ असल्याने या गावांमध्ये माओवाद्यांचे वर्चस्व होते. तसेच गावातील काही सदस्यांचा माओवाद्यांना पाठिंबा होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनास त्यांच्यापर्यंत पोहचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे येथील नागरिक हे शासनाप्रती उदासीन होते. परंतू मागील तीन वर्षामध्ये गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत विविध जनजागरण मेळावे, दिव्यांग मेळावे, कृषी सहली, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, महिला मेळावे इ. च्या माध्यमातून येथील गावकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात यशस्वी झाल्याने पोलीस दलाच्या प्रती येथील गावकऱ्यांचा विश्वास दृढ झाला. यासोबतच माओवाद्यांकडून करण्यात आलेली जाळपोळ व इतर साहित्यांचे केलेले नुकसान, माओवाद्यांकडून पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन करण्यात आलेल्या निष्पाप गावकऱ्यांच्या हत्या व मारहाण, नुकसानीच्या विविध घटना, गावांच्या विकास कामात करण्यात येणारा अडथळा, जनतेला दाखविण्यात येणारा धाक इ. घटनांमुळे माओवादी हे जनतेची दिशाभूल करत आहेत हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्याचाच परिपाक म्हणून आज २४ जून २०२४ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत उपपोस्टे लाहेरी हद्दीतील वरील पाच (05) गावातील गावकऱ्यांनी हा नक्षल गावबंदी ठराव संमत केला तसेच यापूढे गावामार्फत कोणत्याही माओवादी संघटनेस जेवन/राशन/पाणी देणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची मदत करण्यात येणार नाही, गावातील नागरिक स्वत: किंवा त्यांच्या मुलाबाळांना माओवादी संघटनेत सहभागी होऊन कोणत्याही प्रकारचे काम करणार नाही किंवा त्यांची ट्रेनिंग करणार नाही, माओवाद्यांच्या मिटींगला जाणार नाही तसेच माओवाद्यांना खोट्या प्रचारास बळी पडणार नाही असे सांगितले. यावेळी वरील पाचही गावातील नागरिकांनी माओवाद्यांनी पोलीस पथकाला नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले पाच भरमार बंदूक तसेच जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले धारदार लोखंडी २०० ते ३०० सलाखे (Spikes) काढून आणून पोलीस दलाकडे सुपूर्द केली.
यासोबतच पोस्टे धोडराज हद्दीतील नेलगुंडा या गावातील नागरिकांनी १४ जून रोजी गावात नक्षल गावबंदी केल्याचा ठराव पोस्टे धोडराज येथे सादर केला होता. त्यामुळे आज येथील गावक­यांनी पोस्टे धोडराज हद्दीत सुरक्षा रक्षक दलांना नूकसान पोहचविण्याच्या उद्देशाने जंगलात खड्डे करुन त्यात पुरुन ठेवलेले ४५० सलाखे (Spikes) व कुकरमध्ये ठेवलेल्या आयडी सदृश वस्तू पोस्टे धोडराज येथे जमा केले.
सदरची कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी येथील प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पोउपनि. प्रशांत डगवार, पोउपनि. सचिन सरकटे, पोउपनि. आकाश पुयड व पोस्टे धोडराज येथील प्रभारी अधिकारी शरद काकळीज, पोउपनि. अमोल सुर्यवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. सदर नक्षल गावबंदी ठराव करणाऱ्या पाच गावातील नागरिकांचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अभिनंदन केले असून, अबुझमाड जंगल परिसरातील इतर गावातील नागरिकांनीे माओवाद्यांच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता स्वत:च्या व गावाच्या विकासासाठी प्रयत्नशिल राहावे. गडचिरोली पोलीस दल सदैव तुमच्या पाठीशी असून गडचिरोली जिल्ह्रास माओवादी मुक्त जिल्हा करण्यात अशाच प्रकारची मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #naxalgavbandi #bhamragadh #dhodraj )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here