The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : शेतावरून परत येताना दुचाकीवरून जात असलेल्या शेतकऱ्याचा, रस्त्यात अचानक आलेल्या गाईमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन अखेर नागपूर येथे ३१ जुलै रोजी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
राजशेखर वसंत मुंडले (वय ४५) रा. तुकुम, ता. धानोरा, जि. गडचिरोली असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. २८ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शेतावरून परत येत असताना तुकुम गावाजवळ रस्त्यावर गाय आडवी आली. अचानक आलेल्या गाईमुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडाला जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की राजशेखर मुंडले हे जागीच बेशुद्ध झाले.
तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर मार आणि कानातून रक्तस्राव सुरू असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ गडचिरोली येथून नागपूर मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले. चार दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या या शेतकऱ्याची अखेर ३१ जुलै रोजी सकाळी प्राणज्योत मालवली.
राजशेखर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, दोन भाऊ, वहिनी व त्यांच्या कुटुंबियांसह मोठा आप्तपरिवार आहे. एक कष्टकरी, कर्तृत्ववान शेतकरी म्हणून राजशेखर यांची ओळख होती. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानही झाला होता.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora
