– काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : “सत्तेत येण्यापूर्वी आश्वासनं, आणि सत्ता मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या पाठीवर वार” — अशा शब्दांत गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. खरीप हंगाम सुरू होऊनही शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी शासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा महामंडळाच्या कार्यालयासमोर टाळा ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस देण्याचे गाजावाजा करत आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेतीचे काम वेग घेत असून बी-बियाणे, मशागत, मजुरी या सगळ्यांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. याशिवाय, मागील हंगामात आलेले अवकाळी पावसाचे संकट, पूरपरिस्थिती व जंगली हत्तींच्या हल्ल्यांमुळे पीक हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असताना बोनस मिळणे ही त्यांच्या हक्काची आणि तातडीची गरज आहे, असे ब्राह्मणवाडे यांनी स्पष्ट केले. शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास, जिल्ह्यातील महामंडळ कार्यालयाला टाळा ठोकून आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
