मेंदूला सातत्याने मिळणाऱ्या ऑक्सिजनयुक्त रक्तप्रवाहामुळेच माणसासह सर्व सजीव प्राणी जिवंत राहू शकतात. रक्त ही अशी जीवनदायी संपत्ती आहे, जी कोणत्याही कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. म्हणूनच रक्तदानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. म्हणूनच “रक्तदान हे श्रेष्ठदान” मानले जाते.
रक्तदान अनेक कारणांमुळे इतर सर्व प्रकारच्या दानांपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते. प्रथम, हे आपत्कालीन परिस्थिती, शस्त्रक्रिया, गंभीर अपघात अथवा जुनाट आजार असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवते. दुसरे म्हणजे, ही एक सोपी, सुरक्षित आणि वेळोवेळी करता येणारी प्रक्रिया आहे, ज्यामुळे इच्छुक व्यक्ती नियमितपणे समाजासाठी योगदान देऊ शकते.
नियमित, ऐच्छिक आणि विनामूल्य रक्तदान करणारे दाते हे समाजासाठी एक अमूल्य आधारस्तंभ आहेत. त्यांच्या निस्वार्थ योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी १४ जून रोजी “जागतिक रक्तदाता दिन” साजरा केला जातो. यंदा भारत “रक्त द्या, आशा द्या : एकत्रितपणे आपण जीव वाचवू!” या घोषवाक्याखाली जागतिक समुदायासोबत सहभागी होत आहे.
रक्तदान ही केवळ सेवा नव्हे तर आरोग्यास पोषक कृती आहे. नियमित रक्तदान केल्यास रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि टायफॉईड, कावीळ, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लकवा, वात यांसारख्या अनेक आजारांपासून दूर राहता येते. रक्तदानाच्या माध्यमातून आपण थॅलेसेमिया, सिकलसेल, अॅनिमिया, कर्करोगग्रस्त, गरोदर माता आणि अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवू शकतो.
रक्तदान ही एक सशक्त समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. ही कृती व्यक्तीच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. प्रत्येक रक्तदात्याचे योगदान समाजासाठी दीपस्तंभासारखे असते. रक्तदानामुळे रुग्णालयांमध्ये रक्तसाठा उपलब्ध राहतो आणि गरजूंना वेळेत उपचार मिळतात.
रक्तदान ही लहान कृती वाटत असली तरी ती मोठा परिणाम घडवून आणू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करण्याचा संकल्प करावा व इतरांनाही यासाठी प्रेरित करावे. रक्तदानाच्या महत्त्वाची जाणीव समाजात निर्माण करणे आणि अधिकाधिक लोकांना यासाठी प्रोत्साहित करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, रक्तदान करूया – प्राण वाचवूया – राष्ट्रहित जपूया!
रक्त द्या, आशा द्या : एकत्रितपणे आपण जीव वाचवू!
लेखक :
आकाश प्रभाकर आंबोरकर
कोषाध्यक्ष, स्वयं रक्तदाता समिती / सामाजिक कार्यकर्ता