– लवकरच नवी तारीख जाहीर होणार
The गडविश्व
चामोर्शी, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खासगी जमिनी वाचवण्यासाठी नियोजित असलेली ‘जमीन हक्क परिषद’ हवामानाच्या अनिश्चिततेमुळे आणि प्रशासनाच्या जमावबंदी आदेशामुळे तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे.
१८ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या विविध प्रकल्पांसाठी लाखो एकर खासगी जमीनींचे भूसंपादन होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे.
राज्यातील सर्वात कमी शेतजमिनीचे क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात जर हे भूसंपादन बळजबरीने झाले, तर शेतकऱ्यांचे जगणे कठीण होईल, अशी भूमिका या परिषदेमागे होती.
मात्र, जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे आणि हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिल्यामुळे ही परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते आणि आयोजक रमेश चौखुंडे यांनी ही माहिती दिली असून, नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
