महान समाज सेविका भारतरत्न मदर टेरेसा

238

महान समाज सेविका भारतरत्न मदर टेरेसा

जन्म : 26 ऑगस्ट 1910
( स्कॉप्जे शहर, मसेदोनिया )

मृत्यू : 5 सप्टेंबर 1997
( कलकत्ता, भारत )

नाव : अगनेस गोंझा बोयाजिजू
वडिल : निकोला बोयाजू
आई : द्रना बोयाजू
कार्य : मिशनरी ऑफ चैरिटी ची स्थापना, मानवतेची सेवा

“जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही “* या जीवनात वाक्या नुसार समर्पित आयुष्य जगलेल्या मदर टेरेसा यांनी आयुष्यभर दुसऱ्याची सेवा आणि सहाय्य करत स्वतःला समर्पित केले. ती एक अत्यंत उदार, दयाळु आणि निस्वार्थ प्रेम करणारी महिला होती त्यांच्या रोमा रोमात दया आणि सेवेचा भाव भरून होता. निस्वार्थ भावाने मदर टेरेसा गरिब, आजारी, लाचार, असाहय्य आणि गरजवंतांची मदत करत असत. त्या स्वतःकरता नव्हे तर इतरांकरता जगत होत्या. त्या मुळात भारतिय वंशाच्या नव्हत्या परंतु त्या ज्यावेळी भारतात आल्या तेव्हां त्यांना येथील लोकांकडुन इतके प्रेम आणि स्नेह मिळाला की त्यांनी आपले उरलेले आयुष्य भारतात व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, ईतकेच नव्हें तर भारतिय समाजात त्यांनी महत्वपुर्ण योगदान देखील दिलं. सामाजिक कार्यात दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाकरता मदर टेरेसा यांना देशातील सर्वोच्च असा भारत सन्मान देखील मिळाला. पद्मश्री आणि नोबेल पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मदर टेरेसा यांच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. मानवतेचे त्या एक उत्तम उदाहरण ठरल्या, निस्वार्थ आई प्रमाणे सेवाभावाने काळजी घेणाऱ्या मदर टेरेसा यांना गरीबांची कैवारी, दयाळु आई, मदर मेरी आणि विश्वजननी अश्या अनेक नावांनी ओळखत असत. आज या आर्टिकल मधुन आम्ही आपल्याला त्यांच्या जन्मापासुन त्यांचे भारत आगमन आणि समाजाकरता त्यांनी केलेल्या महान कार्यांची, त्यांच्या संघर्षाची माहिती सांगणार आहोत.

मदर टेरेसा यांचा जन्म आणि परिवार
26 ऑगस्ट 1910 साली मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर टेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी 8 वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर टेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर टेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थीतीतुन गेले. मदर टेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्च मधे जाऊन धार्मिक गीत गायन करीत असे. ती ज्यावेळी केवळ 12 वर्षांची होती तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेली असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा तिने मनोमन निश्चय घेतला होता. 1928 साली ज्यावेळी मदर टेरेसा फक्त 18 वर्षांची होती तेव्हां त्यांनी नन चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे कार्य करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी टेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करत्या झाल्या.

मदर टेरेसा यांचे भारतात आगमन
मदर टेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत 1929 साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षीका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर टेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षीका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या. हा तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर टेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजवंतांची सेवा करण्याचा निश्चय केला.

मिशनरी ऑफ चॅरीटी ची स्थापना
गरीब आणि गरजवंतांची मदत करण्याच्या हेतुने मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे 1948 ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दीलं. खुप प्रयत्नांनंतर 7 ऑक्टोबर 1950 ला मदर टेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजवंत, रूग्णं, आणि लाचारांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर टेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे.

मदर टेरेसा यांचे निधन
मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 1983 साली ज्यावेळी त्या रोम ला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा 1989 साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, 1991 ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. 1997 ला मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी च्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व 5 सप्टेंबर 1997 ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अश्या त-हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.

सन्मान/पुरस्कार
निस्वार्थ भावनेने गरीब असाहाय्य लोकांची सेवा केल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या मानवतेच्या सेवेला पाहुन भारत सरकारने त्यांना 1962 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविलं. पुढे त्यांना देशातील सर्वोच्च असा ’भारतरत्न ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या व्यतिरीक्त त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता 1979 ला नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. या दयासागर हृदयाच्या मातेने नोबेल पुरस्काराची 192,000 डाॅलर धनराशी देखील गरीबांच्या मदतीकरता उपयोगात आणली. याशिवाय 1985 साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्ड ने देखील गौरवान्वित करण्यात आले. मदर टेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर तारीफ ए काबिल आहे. सर्वांनीच मदर टेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

लेखक : श्री, सुरेश रामचंद्र चुधरी,गोकुळनगर वार्ड 23 गडचिरोली)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here