गडचिरोलीतील पंचतारांकित आयसीयुला टाळे : चौकशी करून जनतेसाठी खुले करा

1503

– शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

The गडविश्व
गडचिरोली : राज्यातील अविकसित, नक्षलग्रस्त आणि आदिवासी जिल्ह्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्याच्या नावाने जिल्हा ठिकाणी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्चून मागील दोन वर्षांपूर्वी पंचतारांकित आयसीयु दवाखान्याचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर दवाखान्याचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतरही मागील दोन वर्षांपासून सदर पंचतारांकित आयसीयुला टाळे लावून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून आयसीयु जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा यांनी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे सचिव यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर पंचतारांकित आयसीयुचे बांधकाम करुन तत्कालीन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी आपली वारेमाप वाहवाहकी केल्यानंतरही ते सुरू होवू शकले नसल्याने आता या बांधकामात काही ‘वास्तूदोष’ निर्माण झाला की पंचतारांकित ‘भ्रष्टाचार’ झाला याची चौकशी होणे अत्यावश्यक झाले आहे.
एवढेच नव्हे तर कोविड – १९ काळात जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा वापर योग्य त्या कामासाठी झाला की संबंधित अधिकाऱ्यांनी स्थावर मालमत्ता उभी करण्यासाठी वापरली याचीही चौकशी गुप्तचर विभागाच्या मार्फत करण्याची मागणी जयश्रीताई वेळदा यांनी केली आहे.
तसेच वैक्तीश: या ‘पंचतारांकित’ प्रकरणाची दखल घेवून त्याच्या चौकशीचे आदेश द्यावेत व दोषींना गजाआड करुन सदर आयसीयु दवाखाना तातडीने जनतेसाठी उपलब्ध करून द्यावे, अशीही माहिती जयश्री वेळदा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here