The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : सार्वत्रिक बहुउद्देशीय संस्था, नवेगाव यांच्या सौजन्याने ०१ मे ते ३० मे २०२५ दरम्यान ५ ते १० व ११ ते १६ वर्षे वयोगटातील शालेय मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराचा समारोप आज उत्साहात पार पडला.
समारोप कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष वाणीश्यामजी येरमे (नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कुलसंगे यांनी केले. तर प्रस्तावना संस्थेचे सल्लागार मुकुंद मेश्राम यांनी सादर केली. शिबिरात सहभागी मुलांनी ३० दिवसांत आत्मसात केलेल्या विविध कौशल्यांचे सादरीकरण केले. त्यात योगासने, प्राणायाम, नृत्य, गायन, मॉडेलिंग आदी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या सचिव सुनील दुर्गे (उपविभागीय अभियंता, जि.प. गडचिरोली), मुख्याध्यापक किशोर आनंदवार, प्रा. संध्याताई येलेकर आणि लोकमत जिल्हा प्रतिनिधी हरीश सिडाम यांनी शिबिराच्या उपयुक्ततेवर प्रकाश टाकत मुलांचे कौतुक केले व मार्गदर्शन दिले.
शिबिरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सर्व मुलांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच शिबिरासाठी योगदान दिलेल्या शिक्षक व शिक्षिकांना सुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीताई धीरजकुमार जुमनाके यांनी शिबिर आयोजनाविषयी मनोगत व्यक्त करत पालकांना मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. समारोपात अध्यक्षीय भाषणातून वाणीश्यामजी येरमे यांनी मुलांच्या बहुआयामी विकासाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी संस्थेचे सल्लागार मुकुंद मेश्राम, प्रदीप कुलसंगे, उपाध्यक्ष विजय आत्राम, सदस्य डॉ. अभिजित गेडाम, संगीता कुंभरे व रेवनाथ निकुरे यांनी अतुलनीय परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कोषाध्यक्ष धीरजकुमार गजानन जुमनाके यांनी सर्व मान्यवरांचे व पालकांचे आभार मानून समारोप जाहीर केला.
या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देत त्यांच्यातील सुप्त गुणांना योग्य दिशा देण्याचे कार्य संस्थेने यशस्वीरीत्या पार पाडले, असे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले.
