The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : अनुसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणे करिता शासनाने २६ डिसेंबर २०२४ च्या सुधारित शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थ्यांना ११वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये जिल्हा तसेच तालुकाच्या हद्यीपासुन ५ कि.मी. अंतरावर असलेल्या विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी/१२वी/पदवी/पदविका परिक्षेमध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे. तसेच या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे.
या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसुचितजाती व नवबौद्धप्रवर्गातील), विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असेल. दिव्यांग (अनुसुचितजाती व नवबौद्धप्रवर्गातील) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४० टक्के इतकी रहील. तसेच तृतीयपंथी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी १५ मार्च २०२५ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ.सचीन मडावी, यांनी केले आहे.
