– ३९ कोटींपेक्षा जास्त रक्कम नागरिकांच्या नावावर आरबीआयमध्ये उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली, दि.१० : गेल्या १० वर्षांपासून व्यवहार न झालेल्या निष्क्रिय बँक खात्यांमधील ठेवी रकमेचा लाभ आता पुन्हा खातेदारांना मिळू शकतो. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार अशा ठेवी “ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” मध्ये हस्तांतरित केल्या जातात, परंतु त्या कायमस्वरूपी गमावल्या जात नाहीत. ठेवीदारांना योग्य अर्ज आणि केवायसी कागदपत्रांद्वारे आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठी रक्कम उपलब्ध
गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमधील 1 लाख 21 हजार 54 खात्यांमध्ये एकूण 39 कोटी 44 लाख रुपयांची रक्कम अशी निष्क्रिय ठेवी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निधी खात्यात नोंद आहे. ही रक्कम संबंधित खातेधारकांनी सहजपणे आपल्या बँकेत संपर्क करून परत मिळवता येऊ शकते. आतापर्यंत २५८ नागरिकांनी दावा करून २.२२ कोटी रुपये परत मिळवले असून, इतर सर्व ठेवीदारांनीही तातडीने आपली प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकांच्या सहभागातून एक दिवसीय जनजागृती शिबिर घेण्यात आले.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केवायसी अद्ययावत करून आणि ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी दावा नोंदविण्याचे व आपल्या जुन्या बँक खात्यांची पडताळणी करून ही रक्कम परत मिळवावी, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














