– शेतकरी न्याय पदयात्रेत १५ ठोस मागण्या मांडल्या
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : “नरेंद्र मोदी हे स्वतःला योगी म्हणवतात, पण प्रत्यक्षात ते सत्ताभोगी आहेत. ११ वर्षांपासून पंतप्रधान असूनही त्यांनी जनतेला दिलेली एकही आश्वासन पूर्ण केली नाही. फडणवीस गडचिरोलीत विकासासाठी नव्हे, तर सुरजागडच्या खदानीतून स्वतःची तुंबडी भरण्यासाठी येतात. गडचिरोलीचे ‘फडणवीसस्थान’ करण्याचा त्यांचा डाव आहे,” असा तीव्र आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गडचिरोलीत केला.
राज्यातील भाजप-शिंदे युती सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले, “हे सरकार जनतेला दिलेली वचने पाळत नाही, उलट खोट्या घोषणांनी जनतेची फसवणूक करत आहे. सुरजागडच्या खदानीला विरोध करू नये म्हणून विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने लेखी निवेदने घेतली जातात. विरोधी बातम्या छापल्यास पत्रकारांवर कारवाई केली जाते. मुंबईत मराठी माणूस शोधावा लागतो, तशीच परिस्थिती लवकरच गडचिरोलीची होणार आहे.”
काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून राज्यभरात मशाल मोर्चांची सुरुवात झाली. गडचिरोलीत झालेल्या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले. या ‘शेतकरी न्याय पदयात्रा व मशाल मोर्चा’मध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभाताई धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेस सचिव कुणाल चौधरी, आ.रामदास मसराम ,आ.अभिजीत भाऊ वंजारी, माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार सुभाष धोटे, निरीक्षक सचिन भाऊ नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव ऍड. विश्व्जीत कोवासे, प्रकाश इटनकर, माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर, पाटील पोरेटी , सतीश वारजूरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष कविता मोहरकर, सर्व तालुकाध्यक्ष, सर्व सेलअध्यक्ष, शेतकरी, महिला, युवक यांच्यासह काँग्रेस चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वडेट्टीवारांचा घणाघात : ‘तिघे भाऊ मिळून महाराष्ट्र लुटत आहेत’
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यात भाजप युती सरकारने मतचोरी करून सत्ता काबीज केली आहे. हे सरकार चोरीचं सरकार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, आत्महत्या वाढत आहेत, ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली फक्त ५०० रुपये देत आहेत. सरकारकडे पैसे नाहीत तर घोषणा का केल्या? हे सरकार शेतकरी आणि महिलांचा विश्वासघात करत आहे.”
शेतकऱ्यांच्या १५ ठोस मागण्या मांडल्या
शेतकरी न्याय पदयात्रा आणि मशाल मोर्चादरम्यान काँग्रेसने सरकारकडे १५ ठोस मागण्या मांडल्या. शेतकऱ्यांना तातडीने पूर्ण कर्जमाफी देण्यात यावी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा. वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या शेतीच्या नुकसानीसाठी नुकसानभरपाई ५० हजारांवरून १ लाख रुपये करण्यात यावी. अद्याप मिळालेला बोनस त्वरित वितरित करावा. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना वेळेवर सोलर पंप मिळावा, बिघाड झाल्यास त्वरित सेवा उपलब्ध व्हावी आणि २४ तास वीजपुरवठा व्हावा. विमानतळासाठी सुपीक शेतजमीन नव्हे, तर शहरालगतची झुडपी व नापिक जमीन अधिग्रहित करण्यात यावी. उद्योग स्थापनेच्या नावाखाली शेतजमिनी कवडीमोल दरात खरेदी करण्याची प्रकरणे चौकशीस घेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. वनहक्काच्या पट्ट्यांसाठी सात पिढ्यांची अट शिथिल करून पात्र शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे द्यावेत. सुरजागड प्रकल्पामुळे वाढलेल्या वाहतुकीने रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि वाढलेले अपघात लक्षात घेता शहराबाहेरील बायपास रस्ता तयार करून आतली खनिज वाहतूक थांबवावी. आरोग्य केंद्रांत डॉक्टर, नर्सेस व औषधांचा तातडीने पुरवठा करण्यात यावा. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून सुरजागड व लॉयड प्रकल्पात किमान ८०% स्थानिकांची भरती सुनिश्चित करावी व सरकारी रिक्त पदांची तातडीने भरती करावी. गोसीखुर्द व मेडीगट्टा धरणांमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर प्रभावी उपाययोजना कराव्यात. रोजगार हमी योजना, सिंचन विहिरी, घरकुल योजनेतील प्रलंबित अनुदान त्वरित वितरित करावे. शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्वी बियाणे, खते आणि कर्ज सुलभपणे मिळावे. जिल्ह्यातील राष्ट्रीय व मुख्य रस्त्यांची कामे मान्सूनपूर्व पूर्ण करण्यात यावीत.
या मोर्चात बोलताना काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारच्या भ्रष्टाचार, खोट्या घोषणा, शेतकरी व आदिवासीविरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोर्चाचा समारोप “गडचिरोलीचा विकास न्यायातून होईल, शोषणातून नव्हे” या घोषणेने करण्यात आला.