– गणपूर रै. परिसरातील सरपंचांचे उपवनसंरक्षकांना निवेदन, तिव्र आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
प्र / येनापुर, दि. ०५ : चामोर्शी तालुक्यातील गणपूर रै. येथे १ मार्च रोजी वाघाने संतोष भाऊजी राऊत या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. सदर वाघ सध्या याच परिसरात वास्तव्य करीत असल्याने परिसरातील नागरीक भयभीत झालेले आहेत. शेतीची कामे बंद झालेली आहेत यामुळे सदर वाघाचा तसेच इतरही हिंस्त्र प्राण्यांचा येत्या चार दिवसांत वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी गणपूर रै. परिसरातील सरपंचांनी आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदन देतांना सोमपल्ली ग्रा.पं. चे सरपंच निलकंठ पा. निखाडे, गणपूर रै. चे सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जिवनदास भोयर, मुधोली चक नं. २ च्या सरपंचा अश्विनी कुमरे, मुधोली रिठचे सरपंच मंगलदास आत्राम, हळदीमाल ग्रा.पं.चे सदस्य संतोष नर्मलवार, अंकुश कांबळे, दिपक राऊत, मनोज कडते, मोरेश्वर मांडवगडे, सुका वाघाडे, जनार्धन सातर, ईश्वर राऊत, सदाशिव कस्तुरे, मुन्ना राऊत, प्रफुल सोनटक्के, नंदु किनेकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, गणपूर रै. शेतशिवारात मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केलेली आहे. यामुळे शेतकरी नेहमीच शेतामध्ये काम करतांना दिसून येतात. परंतु अनेकदा त्यांना हिंस्त्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. मागील काही दिवसांपासून सदर नरभक्षी वाघ वावरत असल्यामुळे शेतकरी आपल्या शेताकडे जाण्यासाठी घाबरत आहेत. यामुळे पिकांचेसुध्दा नुकसान होत आहे. यामुळे येत्या ४ दिवसांत सदर वाघाचा बंदोबस्त करावा, मृतक शेतकरी संतोष राऊत यांच्या मुलाला शासकीय नोकरी देण्यात यावी, अन्यथा परिसरातील जनतेकडून तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा देण्यात आला आहे.
