The गडविश्व
मुंबई, दि. १२ : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) काम करणाऱ्या ५३ हजार ९१० रास्त भाव दुकानदारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता क्विंटलमागे १५० रुपयांऐवजी १७० रुपये (प्रति मेट्रिक टन १७०० रुपये) मार्जिन मिळणार आहे.
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य, साखर आणि इतर वस्तू ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रिक पडताळणीनंतर वाटप केले जाते. यापूर्वी केंद्र सरकारकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये मिळून क्विंटलमागे १५० रुपये मार्जिन दिले जात होते. दुकानदार संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर २० रुपयांची वाढ मंजूर झाली.
या निर्णयामुळे दरवर्षी राज्य शासनाला सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार असून, दुकानदारांना आर्थिक दिलासा मिळून वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #RationShopkeepers #PDS #MaharashtraGovernment #RationDistribution #PublicDistributionSystem #FoodSecurity #RationShop #महाराष्ट्रशासन #रास्तभावदुकान #शिधा #अंत्योदययोजना #मार्जिनवाढ
