– भाजपा नेत्यांचे केंद्र सरकारच्या यशावर प्रकाश
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी ११ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष, तालुका धानोरा तर्फे “संकल्प ते सिद्धी – विकसित भारत संकल्प सभा” हा कार्यक्रम धानोरा येथील आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना अभिवादन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव उसेंडी होते. प्रमुख उपस्थितीत किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथजी साळवे, तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, नगरसेवक संजीव कुंडू, माजी नगरसेवक सुभाषजी धाईत यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संकल्प सभेत मार्गदर्शन करताना नामदेवराव उसेंडी म्हणाले, “काँग्रेसने ६०-६५ वर्षे सत्तेत राहूनही जी कामे पूर्ण करू शकली नाही, ती मोदी सरकारने केवळ ११ वर्षांत पूर्ण केली आहेत.” त्यांनी कलम ३७० रद्द करणे, राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय, कोरोनासारख्या संकटावर नियंत्रण आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्याचा उल्लेख करून मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक केले.
भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर बळकट झाली असून, या प्रगतीचे श्रेय मोदींच्या निर्णायक नेतृत्वाला असल्याचे मतही उसेंडी यांनी व्यक्त केले.
या संकल्प सभेद्वारे कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले. “ही सभा म्हणजे फक्त यशाचा उत्सव नाही, तर पुढील लढाईसाठीची रणधुमाळीही आहे,” असेही उसेंडी म्हणाले.
आदिवासी महामंडळ स्थापन केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
सभेत रमेश भुरसे व साईनाथ साळवे यांनी केंद्र सरकारच्या योजना आणि त्याचा आदिवासी व ग्रामीण भागातील प्रभाव यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष साजन गुंडावार यांनी केले, तर प्रास्ताविक भूमाला परचाके यांनी सादर केले.
