– कृषी विभागाचा इशारा
The गडविश्व
मुंबई, दि. ०९ : राज्यात मान्सूनचा प्रवेश रखडल्याने उष्णतेची लाट १४ जूनपर्यंत कायम राहणार असून, पावसाची शक्यता केवळ काही भागांपुरतीच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता संयम बाळगावा, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पश्चिम किनारपट्टी वगळता विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात तर पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो.
राज्यातील बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत कोणताही सार्वत्रिक मान्सून पाऊस होण्याची शक्यता नाही. केवळ दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह हलकासा पाऊस पडू शकतो. इतर भागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प व विखुरलेल्या स्वरूपाचे राहील.
या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस होईपर्यंत पेरणी आणि लागवड सुरू करू नये. उगाचच घाई केल्यास बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या प्रतिक्षेत सावध पावले उचलूनच शेती हंगाम सुरू करा, असा स्पष्ट सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolipolice #mansun )
