जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेसह दोषींवर गुन्हे दाखल करा : जयश्रीताई वेळदा यांची मागणी

2544

– शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत राज्य मानवी हक्क आयोगाकडे शेतकरी कामगार पक्षाने केली तक्रार
The गडविश्व
गडचिरोली, ८ सप्टेंबर : जिल्ह्यात मागील महिन्याभरात गडचिरोली तालुक्यातील मुडझा येथील दोन आणि एट्टापल्ली तालुक्यातील मलमपाडी येथील एका आदिवासी शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रशासनाची दिरंगाई आणि असंवेदनशील कार्यपद्धती जबाबदार असून जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेसह दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा यांनी केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारीत जयश्रीताई वेळदा यांनी म्हटले आहे की, वैनगंगा नदीला आलेल्या महापूरांमुळे धानपिकांचे नुकसान होवूनही प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने गडचिरोली तालुक्यातील मौजा मुडझा येथील शेतकरी बंडू नामदेव चौधरी (४९) यांनी १४ ऑगस्ट २०२२ तर याच गावातील महेंद्र सदाशिव आवळे यांनी दि. १ सप्टेंबर २०२२ रोजी आत्महत्या केली होती. एट्टापल्ली तालुक्यातील मौजा मलमपाडी येथील उराव आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो (३८) यांनी ३१ ऑगस्ट २०२२ रोजीच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली असून त्याच्या शेतात सुरजागड लोह खाणीतून पावसामुळे वाहून येणाऱ्या लाल गाळामुळे धान पिकाची नुकसान झाल्याने मौजा मंगेर येथे वरिष्ठ अधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी संजय मिणा यांचेकडे न्याय देण्याची मागणी करुनही न्याय न देता जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी, तुम्हाला वनहक्क दावा मंजूर होऊ शकत नाही, तुम्हाला आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र देवू शकत नाही, तुम्हाला आज ना उद्या ही जमीन सोडून द्यावी लागणार आहे, जमीनीचे काहीच कागदपत्रे नसल्याने तुम्हाला नुकसान भरपाई आम्ही देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. या उत्तराने दुखावलेल्या अजय टोप्पो यांनी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. शेती उध्वस्त झाल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांने आत्महत्या करण्याची ही पहिलीच घटना असल्याचेही जयश्रीताई वेळदा यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सदरच्या आत्महत्या या जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे झालेल्या आहेत. मात्र पोलिस विभागाच्या मदतीने दबाव टाकून सदर आत्महत्या दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी बंडू नामदेव चौधरी, महेंद्र सदाशिव आवळे आणि आदिवासी शेतकरी अजय दिलराम टोप्पो यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीरपणे दखल घेऊन निष्पक्षपणे चौकशी व्हावी व जिल्हाधिकारी संजय मिणा आणि इतर दोषींवर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here